पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात रविवारपासून (११ जून) मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकही सुखावले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेनंतर लगेच निसर्गाने साथ दिल्यामुळे शेतकरी आनंदले आहेत. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या शहरी नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सोलापूर जिल्हा दुष्काळाशी सामना करतो आहे. तसेच दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यात मृगाच्या सरी बरसल्या आहेत. या पहिल्याच पावसाने पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती दिसू लागल्याने ‘आनंदी आनंद गडे’ अशी साऱ्यांचीच भावना आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापल्यामुळे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत केलेल्या कामांमध्ये पाणी साठून राहिले आहे. तसेच, ओढे व नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले आहेत. काही शेतांत असलेल्या पिकांतही पाणी भरून राहिले आहे.
एकाच वेळी सर्वदूर पाऊस पडत नसल्यामुळे काही भागांत अजूनही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत; मात्र अनेक भागांत चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच अंगात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. वरुणराजाची ही कृपा यंदाच्या संपूर्ण हंगामात अशी राहू दे, अशी प्रार्थना सर्व जण करत आहेत.